नाशिक : राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना अनेक बैठका झाल्या. राज्यातील सरकार हे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसार चालविले पाहिजे, हा मुद्दा शिवसेनेनेदेखील मान्य केलेला आहे. त्यानुसारच लोकांच्या हितासाठी हे सरकार राज्यघटनेतील तरतुदीनुसार कामकाज करीत असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.कॉँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी घटनेच्या चौकटीत राहूनच सरकार चालवावे लागेल ही कॉँग्रेसची भूमिका शिवसेने मान्य करून तसे लेखी दिलेले आहे, असे विधान केल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. यासंदर्भात नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसारच राज्य सरकार काम करीत असल्याचे सांगितले. तीन पक्षांचे सरकार स्थापन होत असताना लोकशाहीत लोकहितासाठी संविधानाच्या तरतुदीनुसार राज्य सरकारने काम करावे, असा विचार पुढे आला आणि शिवसेनेनेही तो मान्य केला आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.राज्य शासन संविधानाच्या या प्रास्ताविकेनुसार पुढील कामकाज करीत असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले. तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत दिल्लीतदेखील अनेक बैठका झाल्या होत्या. त्यावेळीही लोकशाहीच्या तत्त्वाप्रमाणे सरकार चालविण्यासाठी घटनेतील प्रास्ताविकेच्या तत्त्वाप्रमाणे राज्य सरकारने काम करावे, असा विचार मांडण्यात आलेला होता. त्यानुसार राज्य सरकार काम करीत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.
घटनेच्या प्रास्ताविकेनुसार सरकारचे कामकाज : भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:24 IST