परतीचा प्रवास : मनमाड जंक्शनवर प्रवाशांची गर्दीरेल्वेगाड्या झाल्या ‘फुल्ल’!मनमाड : दिवाळीचा सण संपल्याने परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांमुळे रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मनमाड रेल्वेस्थानक तर प्रवाशांनी फुलून गेले आहे.वर्षभरातील सर्वात आनंदाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणासाठी नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व नागरिक दिवाळीसाठी आपल्या गावी येतात. आता दिवाळीचा हा सण संपल्याने प्रत्येकजण नोकरीच्या गावाकडे पोहचण्याच्या प्रयत्नात आहे. या परतीच्या प्रवाशांच्या गर्दीमुळे मनमाड रेल्वेस्थानकाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून, रेल्वेगाड्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दिसत आहेत. या प्रवाशांच्या गर्दीचा त्रास टाळण्यासाठी परिसरातील अनेक प्रवासी मनमाड रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस तसेच इगतपुरी शटलने प्रवास करणे पसंत करत आहेत. मनमाड रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या इतर गाड्यांमध्ये गर्दीमुळे बसण्यास जागा मिळत नसली तरी मनमाड रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळत असल्याने या गाड्या फलाटाला लागण्यापूर्वीच प्रवासी फलाट क्र. ४ व ५ वर पोहचत आहेत. प्रवाशांची गर्दी वाढल्याने तिकिटासाठी लांबच लांब रांगा असल्याचे दिसून येत आहे. रेल्वेस्थानकावरील बुकिंग खिडक्यांव्यतिरिक्त स्थानकाबाहेर खासगी बुकिंग ठेकेदाराकडे तिकिटे मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासामुळे रेल्वेस्थानक प्रवाशांनी फुलून गेले आहे. (वार्ताहर)
रेल्वेगाड्या झाल्या ‘फुल्ल’!
By admin | Updated: November 16, 2015 00:12 IST