निफाड : निफाड तालुक्यातील कुरूडगाव येथे बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना फस्त करीत असल्याने शेतकर्यांत घबराटीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावूनही काही उपयोग होत नसल्याने शेतकर्यांच्या चिंतेत भर पडत आहे.गेल्या एक महिन्यापासून जळगाव-कुरूडगाव रस्त्यालगत असलेल्या वस्त्यांजवळील उसाच्या शेतात बिबट्याने डेरा टाकला असून, सोबत तीन बछडे (मादी) असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. या परिसरात राहणारे चंद्रभान चिखले यांचे एक वासरू व एक कुत्रे, पंकज पवार यांच्या वस्तीवरील एक कुत्रे, मोगल वस्तीवरील कुत्रे, प्रभाकर नागरे यांची एक शेळी, मेंढी पालनासाठी शेतात पाल टाकून बसलेल्या एकाचे एक घोड्याचे शिंगरू या बिबट्याने फस्त केल्याने या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे वनविभागाने तातडीने याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला असून, उलट पिंजर्यात ठेवलेल्या शेळीलाच त्याने ठार केले व नंतर ठेवलेल्या कोंबड्याही फस्त केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. (वार्ताहर)विशेष म्हणजे रात्री भारनियमनाने लाईट गेल्यास बिबट्या चक्क या वस्तीजवळील घराजवळ येतो. त्यामुळे रात्री आता बाहेर पडणेही शेतकर्यांना मुश्किल झाले आहे. ज्या उसाच्या क्षेत्रात त्याचे वास्तव्य आहे त्याच ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी या शेतकर्यांनी केली आहे.
कुरूडगाव येथे बिबट्याचा पाळीव जनावरांवर हल्ला शेतकरी चिंतेत : पिंजरा लावूनही उपयोग नाही
By admin | Updated: June 1, 2014 00:59 IST