त्र्यंबके श्वर : तळवाडे (त्र्यंबक) येथील शिवाजी शांताराम बोडके (३५) याने आपल्या बांधावरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मंगळवारी रात्री ही आत्महत्त्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सकाळी ७.३०च्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, शेतीच्या कर्जामुळे आत्महत्त्या केली असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्र्यंबकपासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर मयत शिवाजी त्याचे तीन भाऊ, आई असा सर्व एकत्र परिवार राहत आहे. मंगळवारी रात्री जेवण आटोपून सर्वजण झोपायला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर रात्री केव्हा तरी हा प्रकार घडला असावा. दरम्यान, मयत शिवाजी यांच्यावर तळवाडे (त्र्यंबक) वि.का.स.संस्थेचे जिल्हा बँकेमार्फत पीककर्ज रुपये ११ लाख ५६ हजार अधिक व्याज असे कर्ज, महिंद्रा कंपनीकडून घेतलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर (फायनान्सर महिंद्रा) यापैकी उर्वरित हप्ते हे कर्ज होते. मृताच्या खिशात चिठ्ठी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या चिठ्ठीत ‘जीवनाला कंटाळून आत्महत्त्या करीत आहे. माझ्या आत्महत्त्येशी घरातील कुणाचाच संबंध नाही, असे नमूद केले आहे. आत्महत्त्या करण्याच्या कारणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गणेश परदेशी, वाजे आदि तपास करीत आहेत. या आत्महत्त्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)