जायखेडा : कांद्यापाठोपाठ टमाट्याचेही भाव गडगडल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे. चांगला भाव मिळेल या आशेवर चाळीस साचून ठेवलेला कांदा सडण्याबरोबरच टमाट्यावरही विविध रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च करून व विविध समस्यांचा सामना करीत पिकविलेल्या कांदा व टमाट्यातून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घेतलेले कर्ज फेडायचे कसे व उदरिनर्वाह करायचा कसा, या विवंचनेत शेतकरी दिवस काढत आहेत.शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणाऱ्या डाळिंबाचीसुद्धा आधीच पुरती वाताहत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक भिस्त कांदा या पिकावर आहे. अल्प पाण्यात नियोजन करून पिकविलेल्या कांद्याचे शेतकऱ्यांनी विक्र मी उत्पन्न काढले होते. मात्र नंतर बेमोसमी अवकाळीने कांद्याचे मोठे नुकसान झाले. याही परिस्थितीत काही प्रमाणात वाचलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता. दरम्यान, सरकारने अडत व नियमनमुक्तीचा निर्णय घेतल्याने याविरोधात व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. साठवून ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा वेळीच विकला न गेल्याने चाळीतच सडू लागला आहे. अतिरिक्त खर्च करून पिकविलेला कांदा फेकून देण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनही शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याने त्यांची पुरती वाताहत झाली आहे. आता कर्ज फेडण्याबरोबरच दैनंदिन गरजा कशा पूर्ण करायच्या, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाला आहे. (वार्ताहर)
शेतकरी आर्थिक संकटात
By admin | Updated: September 3, 2016 23:41 IST