येवला : पालखेड धरणाचे ओव्हरफ्लो पाणी येवला तालुक्याला मिळावे यासाठी सर्वपक्षीयांनी जिवाचे रान करून अखेर प्रशासनाला पाणी सोडण्यास भाग पाडले. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. जळगाव नेऊर येथील नदीकाठी असलेले सर्व बंधारे पाण्याने भरल्याने, पावसाअभावी खरीप पिके करपू लागल्याने या पाण्याने पिकांना जीवदान मिळेल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागून जनावरांनाही पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा जळगाव नेऊर येथील सर्वच शेतकऱ्यांना होती. परंतु नदी काठी असलेल्या शेतकरी वर्गाला या पाण्याने उभारी मिळाली असली तरी पालखेड डावा कालवा वितरीका क्रमांक २८ व २९ या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाला पाण्याची मात्र प्रतिक्षाच करावी लागली.२८ व २९ चारी क्र मांकावर सुमारे प्रत्येकी १३०० ते १४०० हेक्टर क्षेत्र असुन चारीला पाणी सोडले असते तर सर्व क्षेत्र ओलिताखाली आले असते. शेतशिवारातील विहीरींना थोड्याफार प्रमाणात पाणी उतरले असते. विशेषत: वाडी वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागुन जनावरांना ही पाणी उपलब्ध झाले असते. कोमेजलेली पिके कशी बशी वाचवता आली असती. मात्र पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे नियोजन विस्कळीत झाल्याची प्रचिती जळगाव नेउर येथील शेतकरी वर्गाला आली. पालखेड डावा कालवा येथील लाभ क्षेत्रातील सर्वच वितरीकांना हेड टु टेल पाणी मिळणे आवश्यक होते. परंतु तसे न होता नदीकाठी असलेले बंधारे भरून देणे याचीच काळजी प्रशासनाकडुन घेण्यात आली. वितरीकांना पाणी न सोडल्याने वाडी वस्तीधारकांवर अन्याय झाल्याची भावना शेतकरी वर्गात आहे. (वार्ताहर)
लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित
By admin | Updated: September 13, 2016 01:10 IST