नाशिक : महाराष्ट्रात गोवंश हत्त्याबंदी कायदा लागू झाल्यानंतर भाकड गायी सांभाळाव्या लागणार असल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ येईल, अशी टीका करणाऱ्यांना तथा गोवंश हत्त्याबंदी कायद्याच्या विरोधकांना वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांनी शनिवारी शंकराचार्य संकुलातील व्याख्यानात चांगलेच फटकारले. महाराष्ट्रात गो हत्त्या बंदी कायदा अस्तित्वात येणे हे वारकरी संप्रदायाचे यश असून, देशभरात हा कायदा अस्तित्वात येणे गरजेचे सांगतानाच देशातील शेतकरी गायी सांभाळण्यास समर्थ असल्याचे मत कराडकर यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर नंदिनी गोशाळेचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार, कार्याध्यक्ष एम. एन.पाटील, वसंत खैरनार, महेश पाटील आदि उपस्थित होते. कराडकर म्हणाले, महाभारतात श्रीकृष्णाचा सांभाळ नंद राजाने केला होता. त्याकाळात नऊ लाख गायी असणाऱ्या गोपालकास नंद ही उपाधी दिली जात होती. त्यावेळी गोकूळ व मथुरेत असे नंद अनेक होते. यावरून त्यावेळच्या गोधनाची व भारताच्या संपन्नतेची जाणीव होऊ शकते. आपला देश हा शेकडो वर्षांपासून सधन व संपन्न आहे. या संपन्नतेचे माध्यम व साधन हे गोमाता आहे. यामुळे तिची सेवा हीच खरी देश सेवा आहे. इतिहास पाहता ५०० वर्षे देशावर राज्य करणाऱ्या मोघलांनी गोहत्त्येस राजमान्यता दिली नव्हती. परंतु, भारताच्या संपन्नतेचे गमक गायीमध्ये असल्याचे लक्षात आल्यानंतर इंग्रजांनी मात्र गोहत्त्येस राजमान्यता दिली गायीपासून उस्तर्जित होणारे दूध, गोमूत्र, शेण असे सर्व पदार्थ मानवी शरीरास आरोग्य देणारे आहेत. असे कराडकर यांनी सांगितले.
गायी सांभाळण्यास शेतकरी समर्थ
By admin | Updated: January 1, 2017 00:19 IST