खामखेडा : परिसरातील शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असून, विहिरीच्या पाण्याची पातळीत घट झाल्याने शेतीसिंचन व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. प्रत्येक महिन्याला पडणाऱ्या बेमोसमी पावसामुळे व निसर्गाच्या कालचक्रानुसार शेतकरी आपले वेळापत्रक बदलत असले तरी ते फारसे सोयीचे ठरले नसल्याचे सिद्ध झाले आहे. डिसेंबर महिन्यापासून प्रत्येक महिन्यामध्ये बेमोसमी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ते खरिपाच्या पिकांनी भरून निघणार नाही. या बेमोसमी पावसामुळे जनावरांसाठी रचून ठेवलेला चारा भिजून काळा पडून खराब झाल्यामुळे आता शेतकऱ्यांजवळ जानावरांसाठी चारा शिल्लक राहिला नाही.त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तेव्हा आता जनावरे कशी जगवावी याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे. काही विहिरींना पिण्यासाठी पाणी नाही. काही शेतकऱ्यांनी शेतातील पिके सोडून दिली, तर काही जणांवर शेतातील पिके सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतात वास्तव्य करून राहणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनबरोबर चारा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. (वार्ताहर)
खामखेडा येथे चाऱ्याचा प्रश्न गंभीर
By admin | Updated: April 6, 2016 00:29 IST