नाशिक : सातत्याने रक्तदान करणे हे संवेदनशील समाजमनाचे लक्षण आहे. आपण दिलेले रक्त कोणत्या रुग्णासाठी वापरले जाते हे आपल्याला माहिती नसते. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्व भेदांच्या पलीकडे जाणारे असे हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संचलित जनकल्याण रक्तपेढीच्या नाशिक शाखेचा २८ वा वर्धापनदिन प्रसाद मंगल कार्यालयात नुकताच साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. तर प्रमुख अतिथी असलेले वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी आधुनिक विज्ञान युगातदेखील रक्ताला पर्याय मिळालेला नाही, त्यामुळे रक्तदान करणे हे प्रत्येक निरोगी व्यक्तीचे कर्तव्य असल्याचे सांगितले. यावेळी वर्षभरात एका शिबिरात पन्नासपेक्षा जास्त पिशव्या रक्त संकलित करणाºया संयोजकांचा तसेच प्रातिनिधिक स्वरूपात अमित चोथे या नियमित रक्तदात्याचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक संदीप फाटक आणि दीपक थोरे यांनी केले. यावेळी जनकल्याण समितीचे उपाध्यक्ष जयंत कुलकर्णी तसेच रक्तपेढीचे उपाध्यक्ष अरविंद गडाख हेही यावेळी उपस्थित होते.
जनकल्याण रक्तपेढीचा वर्धापनदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:25 IST