नाशिक : डोंगर पोखरून काढण्यामुळे आणि सपाटीकरणामुळे पुणे जिल्ह्यात माळीण गावावर डोंगरच कोसळला आाणि गाव होत्याचे नव्हते झाले. नाशिक शहरात पांडवलेणीनजीक अशा प्रकारची स्थिती आहे. पायथ्याशी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वसाहती आणि त्यातच दगडासाठी डोंगरात सुरू असलेले खोदकाम यामुळे माळीणच्या घटनेची पुनरावृत्ती नाशिकला होऊ शकते.महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत भीती व्यक्त करण्यात आली. वंदना बिरारी, कुणाल वाघ यांनी या विषयाला हात घातला. पांडवलेणीच्या खाली मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्पांना मंजुरी देण्यात येत आहे. वास्तविक पांडवलेणी क्षेत्रात बांधकामे करताना पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागते; परंतु अशाप्रकारे कोणतीही परवानगी घेतली जात नाही. परिसरातील डोंगरांचे खोदकाम होताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप या नगरसेवकांनी केला आणि नगररचना विभागाने दक्षता घेण्याची मागणी केली. पांडवलेणीच्या पायथ्याशीच मोठे गृहनिर्माण प्रकल्प होत असून, नगररचना विभागाकडून केवळ नकाशे मंजूर करण्याचा सपाटा लावला जात आहे. प्रत्यक्षात बांधकामे, तेथील व्यवस्था याकडे लक्ष पुरवले जात नाही. विशेषत: पावसाळी पाण्याच्या निचऱ्याकडे कोणतेही लक्ष नसल्याने बुधवारी हरी-विश्व सोसायटीजवळ पाणी साचून संरक्षक भिंत कोसळली व त्यात एका मजुराचा बळी गेला याकडेही नगरसेवकांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
डोंगरांचे खोदकाम : गृहनिर्माण प्रकल्पांकडेही दुर्लक्ष
By admin | Updated: August 1, 2014 01:09 IST