लोहोणेर : दुष्काळाने होरपळलेल्या तालुक्याच्या पूर्व भागाला वाढीव चणकापूर उजव्या कालव्याच्या माध्यमातून विहिरींना थोडेफार पाणी आले असले तरी वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. येथील काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली; मात्र विजेअभावी पाणी भरता न आल्याने हे संपूर्ण पीक उन्हाने वाळून गेले आहे. या भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा वीजवितरण विभागाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शेतकरतयांनी दिला आहे. गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खुंटेवाडी, वाखारवाडी, पिंपळगाव, विजयनगर, वाखारी, खडकतळ, खालप आदी गावांच्या शिवारातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे ज्या काही शेतकर्यांच्या विहिरीला पाणी उतरले आहे , त्यांचा या पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न आहे, तर काही शेतकरी कांदा लागवड करत असल्याने या कांदालागवडीस पाणी देण्यासाठी विजेच्या प्रतीक्षेत असतात. मात्र दिवस-रात्र थांबूनही वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी देण्यास मर्यादा पडत आहेत.खुंटेवाडी ता. देवळा येथील हनुमानमळ्यात केलेल्या कांदा लागवडीस विजेअभावी पाणी देता न आल्याने सर्वच कांदा लागवड उन्हाने करपून गेली आहे. कधी नव्हे ते विहिरींना थोडेफार पाणी आले तेही पिकांना देता येत नसल्याने शेतकरी वर्ग हवालिदल झाला आहे. (वार्ताहर)
विजेअभावी पिके करपू लागली
By admin | Updated: September 13, 2016 01:06 IST