निफाड : पावसाळ्यापूर्वी पाटबंधारे खात्याने सायखेड्याच्या गोदावरी पात्रातील पाणवेली न काढल्याने दारणा धरणाचे पाणी गोदावरीत सोडल्यानंतर सायखेडा येथील गोदावरी नदीतील पुलाखालून गोदावरीच्या पुराचे पाणी पुढे सरकण्यास अडथळे निर्माण झाल्याने या पुराचे पाणी या पुलाला लागण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊन हा पूल कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी सायखेड्याच्या ग्रामस्थांनी गोदावरी नदीतील पानवेली काढण्यासंदर्भात वारंवार मागणी केली होती. परंतु ढिसाळ अन् ढिम्म पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाने याकामी अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे आज दारणा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर गोदावरीला पूर आला. या पुराचे पाणी सायखेड्याच्या या पुलाखालून पानवेलीमुळे फारसे पुढे सरकत नसल्याने या नदीपात्रात फुगवटा निर्माण होऊन या पुलाला पाणी लागण्याची वेळ आली आहे.पाण्याच्या रेट्यामुळे हा पूल कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पुराचे पाणी सायखेडा बाजारतळ, चांदोरीच्या स्मशानभूमीत पाणी शिरले होते.
पाणवेलींमुळे पुराचे पाणी लागले पुलाला
By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST