नाशिक : शहरातील यशवंत मंडई व महात्मा फुले मंडई या महापालिकेच्या व्यापारी संकुलांची दुरवस्था झाली असून, असुविधांच्या गर्तेत या इमारती हरविल्या आहेत. फुले मंडईमध्ये घाणीचे साम्राज्य व जाळेजळमटे पसरली आहेत. यशवंत मंडईची इमारत तर जणू मद्यपी, जुगाऱ्यांसाठी आंदण दिली की काय, अशीच शंका तेथे गेल्यावर येते. या इमारतीचे तळमजल्यावरील गाळे वगळता वरील सर्व मजल्यांवरील गाळे भग्नावस्थेत असून, तेथे मद्यपींच्या जोरदार पार्ट्या रंगत असल्याचे पुरावे सहज बघावयास मिळतात.महापालिकेने शहरात व्यापारी संकुले बांधली मात्र त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कोणतीही व्यवस्था पालिकेकडे नाही. स्वच्छता, डागडुजी अशा अनेक बाबतीत व्यावसायिकांना स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा लागतो. त्यामुळे महापालिका केवळ भाडे वसुलीसाठीच आहे काय? असा प्रश्न विक्रेते व्यावसायिक करतात. याउलट या मंडईच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका दरवर्षी सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च करते; मात्र मंडईमधील विक्रेत्यांकडून थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्याने महापालिकेला सोयीसुविधा पुरविण्यामध्ये अडथळा निर्माण होतो, असा पालिकेचा दावा आहे.मात्र असे असले तरी पालिकेच्या व्यापारी संकुलांमध्ये असलेल्या अशा अवस्थेमुळे व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यात महापालिकेने रेडीरेकनरनुसार दर आकारणीचा प्रस्ताव मांडून व्यावसायिकांच्या जखमीवर मीठ चोळले आहे.
पालिकेचे व्यापारी संकुल असुविधांच्या गर्तेत
By admin | Updated: May 22, 2016 22:44 IST