नाशिक : वडाळा नाका परिसरात मुख्य रस्त्यावर रिलायन्स फोरजीसाठी केलेल्या खोदकामामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. वीज वितरण कंपनीने शोधकार्य केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यामुळे रिलायन्स कंपनीच्या ठेकेदाराविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या सहा महिन्यांपासून शहराच्या विविध भागांत रिलायन्स फोरजी सेवेसाठी खोदकाम सुरू आहे. खोदकामामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा झाला तसेच नवीन रस्ते खोदण्यात आले. तथापि, रिलायन्सवर कोणतीही कारवाई महापालिकेने किंवा पोलिसांनी केलेली नाही; परंतु वीज वितरण कंपनीने मात्र रिलायन्सला झटका दिला आहे. गेल्या मंगळवारी वडाळा नाका परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महावितरणच्या कर्मचार्यांनी वीजपुरवठा खंडित का झाला याची तपासणी केली तेव्हा वडाळा नाका येथे रवींद्र मंगल कार्यालयाजवळ केबल तुटली असल्याचे आढळले. रिलायन्स फोरजीसाठी केलेल्या खोदकामामुळे हा प्रकार झाल्याचे आढळले. त्यामुळे महावितरणचे अभियंता सतीश कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्याच्या खोदकामामुळे वीजपुरवठा खंडित रिलायन्सला झटका : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By admin | Updated: May 3, 2014 16:17 IST