सिन्नर : नाशिक बाजार समितीच्या आवारात टमाट्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टमाट्याच्या वीस किलो प्रतिक्रेटमागे सुमारे चारशे रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.तालुक्यात गेल्या दोन महिने उशिरा पाऊस झाल्याने खरीप हंगामासह भाजीपालावर्गीय पिकांची लागवडही उशिरा झाली होती. थोड्याफार प्रमाणात झालेल्या रिमझिम पावसावर विविध पिके आली. प्रारंभी टमाट्याच्या प्रतिवीस किलोचा भाव समाधानकार होता, मात्र टमाट्याची आवक वाढू लागताच दर कमी झाले. सुमारे चारशे रुपयांनी दर घसरल्याने शेतकऱ्यांचा खर्चही फिटत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. रिमझिम पाऊस, ढगाळ हवामान यामुळे पिकांवर विविध रोगांचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारली. मात्र सध्या दर पडल्याने उत्पादन खर्च मिळणेही दुरापास्त झाले आहे. (वार्ताहर)
टमाट्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका
By admin | Updated: September 2, 2014 01:11 IST