नाशिक : आगामी महापौरपदासाठी येत्या १९ आॅगस्ट रोजी मुंबईत सोडत काढली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून, त्याकडे पालिकेतील साऱ्या इच्छुकांचे लक्ष लागून आहे.विद्यमान महापौर-उपमहापौरपदाची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे त्याकडे लक्ष लागून आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि महापौरपदाच्या निवडणुका टाळण्यासाठी विद्यमान महापौरांना मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा विचार होता. तथापि, त्यास विरोध झाल्यानंतर राज्य शासनाचा नाइलाज झाला. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुका ठरल्या वेळीच होणार हे स्पष्ट झाले असले, तरी त्यासाठी आरक्षणाची सोडत निघत नसल्याने इच्छुकांचे त्याकडे लक्ष लागून होते. आता १९ तारखेला मंत्रालयात नाशिकसह अन्य शहरांच्या महापौरपदाची सोडत निघणार असल्याचे वृत्त आहे. महापालिकेत मनसेचे ३९ नगरसेवक असून, भाजपाच्या १४ नगरसेवकांनी तसेच जनराज्य आघाडीने पाठिंबा दिला असल्याने मनसे-भाजपाची सत्ता आली. मात्र अडीच वर्षांत राजकीय बदल झाले असून, नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपा यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने आता त्याचे परिणाम यंदाच्या महापौरपदाच्या निवडणुकीत दिसणार आहेत. (प्रतिनिधी)
महापौरपदासाठी १९ आॅगस्टला सोडत?
By admin | Updated: August 8, 2014 01:54 IST