नाशिक : जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कामे केल्यानंतर ती कामे खराब होतात, पर्यायाने जिल्हा परिषदेची बदनामी होते. त्यामुळे यापुढे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागास कामे करण्यास ना हरकत दाखला देण्यात येऊ नये. तो निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.मंगळवारी (दि.१)स्थायी समितीच्या बैठकीस अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती किरण थोरे, शोभा डोखळे, उषा बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड आदि उपस्थित होते. अंगणवाड्यांना अंडी पुरविण्याचा निधी प्राप्त झाला, मात्र फोटो पुरतेच अंडी वाटप करण्यात आली, असे होता कामा नये, अशी सूचना अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी व्यक्त केली. मिलिंद शंभरकर यांनी याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवण्याची सूचना केली. प्रा.अनिल पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण भागात २४ तास वीजपुरवठा होत नसल्याची तक्रार केली. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना २४ तास वीजपुरवठा झालाच पाहिजे, त्यामुळे आरोग्य केंद्रांनजीकच्या उपकेंद्रांच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात, असे आदेश दिले. मालेगाव उपविभागांतर्गत वीज वितरण कंपनीचे अधिकारी रात्री हजर राहत नसल्याची तक्रार शैलेश सूर्यवंशी यांनी केली. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता बैठकीस उपस्थित नसल्याबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. मिलिंद शंभरकर यांनी पुढील बैठकीस त्यांना बोलवा, असे सांगितले. आदर्श संसद दत्तक ग्राम योजनेसाठी खासदारांनी त्यांचा निधी वापरावा, जिल्हा परिषदेचा निधी वापरण्याची गरज काय? असा प्रश्न प्रकाश वडजे यांनी उपस्थित करीत याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पशुसंवर्धन दवाखान्यांमध्ये औषधे नसून आपल्या मुखेड पशुवैद्यकीय दवाखान्यात तर सहा महिन्यांपासून औषध नसल्याची तक्रार बाळासाहेब गुंड यांनी केली. प्रा. अनिल पाटील यांनी आपल्या गावातील कंधाणे पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या सहा महिन्यांपासून डॉक्टरच उपस्थित राहत नसून याबाबत कडक कारवाईची मागणी केली. त्याचवेळी केवळ डॉक्टरच नाही तर ग्रामसेवकही ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहत नाही. सरकारी जागेवर अतिक्रमण काढण्यास नकार देतात, अशी खंत प्रवीण जाधव यांनी व्यक्त करीत यंत्रणा सुधारण्याची मागणी केली. जागेवर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष विजयश्री चुंबळे. समवेत डावीकडून सुनील गायकवाड, मिलिंद शंभरकर, प्रकाश वडजे, किरण थोरे, उषा बच्छाव, शोभा डोखळे.
झेडपीच्या रस्त्यावर पीडब्ल्यूडी नको
By admin | Updated: December 1, 2015 23:20 IST