नाशिक : गेल्या चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटात टाकले आहे. गेली अनेक वर्षे दुष्काळाशी सामना करताना नाकी नऊ आलेल्या शेतकऱ्याने थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसाचा आधार घेत कांद्याची रोपे, द्राक्ष, टमाटे लावून कर्जाचा डोंगर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बेमोसमी पावसाने या प्रयत्नावर पाणी फेरले आहे. कोनांबे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोनांबे परिसरात बेमोसमी पावसामुळे दैनंदिन फवारण्यांबरोबरच इतर फवारण्याही कराव्या लागत असल्याने उत्पादकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.पाऊस व ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा मारा वाढत आहे. फुलोरा असलेल्या द्राक्षबागांमध्ये घडकुज वाढत आहे. डावणी, भुरी यांसारख्या रोगांचा प्रतिकार करण्यासाठी आंतरप्रवाही व स्पर्शजन्य औषधांच्या अतिरिक्त फवारण्या कराव्या लागत आहे.द्राक्ष पीक सल्लागारांना संपर्क करूनच फवारणी करून आलेल्या संकटावर मात करण्याची धडपड सुरू असल्याचे द्राक्ष निर्यातदार दत्तात्रय डावरे यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे तीन-चार दिवस अगोदरच हवामानाचा अंदाज समजतो. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर येणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी हवामानाचा अंदाज घेऊन अगोदरच उपाययोजना करण्याचे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय संचालक बाजीराव डावरे यांनी केले आहे.खामखेडा परिसरात झालेल्या बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. परिसरात गेल्या दोन दिवसांपासूून अचानक वादळीवाऱ्यासह बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. शेतात उघड्यावर पडलेली मक्याची कणसे झाकण्यासाठी धांदल उडाली. तेव्हा शेतीसाठी बियाणे, खत यासाठी आणलेले पैसे कसे परत करावे याची चिंता बळीराजाला सतावत आहे. तेव्हा नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येऊन शासकीय स्तरावरून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.ओतूर : परिसरात गेल्या दोन दिवसांपासूून वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.सध्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे तर काही शेतकरी उन्हाळ नाशिक गावठी कांद्याची लागवड करीत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी लाल कांदा काढून शेतात ठेवला आहे तो पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे. तसेच उघड्यावर पडलेल्या मक्याचेही नुकसान झाले.इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद पूर्वभागातील भात व टमाटा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे याबाबतचे निवेदन आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिले आहे. तालुक्यात झालेल्या पावसाने भात पिकासोबत टमाट्याला हमीभाव मिळालाच पाहिजे व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.चांदवड तालुक्यातील खडकओझर लघुपाटबंधारे हा नाशिक पाटबंधारे विभागांतर्गत असून, सदरच्या तलावातील गाळ काढल्याने त्याची क्षमता वाढलेली आहे. सदरचा तलाव गेल्या दहा वर्षात प्रथमच पूर्ण भरलेला आहे. सदर तलावातील पाणी शेती सिंचनासाठी मिळावे यासाठी पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांनी उपसा योजनेच्या परवानग्या सन १९९१ ते १९९९ या दरम्यान घेतल्या आहेत व त्याच आजतागायत कायम आहे. या परवानग्या घेतल्यानंतर उपसा योजनेसाठी लागणारा विद्युत पुरवठा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून घेतलेला आहे. तसेच पाटबंधारे विभाग दरवर्षी पाणी वापराचा महसूल जमा करत आहे. जोपूळ व देवरगाव या गावासाठीची पिण्याच्या पाण्याची योजना सादर आहे. तरी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सोडून उर्वरित ल.पा. तलावातील पाणी हे सिंचनासाठी वापरण्यास मिळावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली. (लोकमत चमू)
जिल्ह्याला बेमोसमीचा फटका
By admin | Updated: November 24, 2015 21:42 IST