नाशिक : ‘जितके रेशन कार्ड तितकेच धान्य’ अशा हेतूने सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सुधारणा करण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून करण्यात येणार आहे. रेशन दुकानदार व पुरवठा खात्यातील सरकारी बाबूंच्या ‘हातमिळवणी’ला या नवीन प्रणालीमुळे आळा बसण्याबरोबरच, रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यास मदत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन प्रणालीनुसार आता दरमहा अन्नसुरक्षा कायद्याने पात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या आॅनलाइनने मुंबईला कळविण्यात येईल व तेथूनच प्रत्येक दुकाननिहाय असलेल्या रेशन कार्डची संख्या व त्याला अदा केल्या जाणाऱ्या धान्याचे अॅलोकेशन (वितरण) केले जाणार आहे. त्यामुळे दुकानदाराला त्याच्याकडे असलेल्या कार्डच्या संख्येतच धान्य दिले जाणार असून, त्याने त्याचे त्याच महिन्यात वितरण करावे; परंतु जर काही कारणास्तव त्याच्याकडे धान्य शिल्लक असले तर या शिल्लक धान्याबाबतही शासनाला कळवून त्यातूनच दुसऱ्या महिन्यासाठी तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापूर्वी जिल्हा पातळीवरच धान्याचा कोटा मंजूर करून तो तालुका पातळीवर पाठविला जात होता. त्यामुळे दुकानदार व संबंधित अधिकारी-कर्मचारी हातमिळवणी करून मर्जीतील दुकानदाराला धान्य वाढवून देत. त्यातून काळ्याबाजाराला मोठा वाव निर्माण होत होता. काही ठरावीक दुकानदारांवरच ही मेहेरबानी होत असल्याच्याही तक्रारी केल्या जात होत्या. आता मात्र नवीन प्रणालीमुळे या साऱ्या गोष्टींना अटकाव तर बसेलच; शिवाय पुरवठा खात्यावरील कामाचा ताणही कमी होणार आहे. दरमहा त्या-त्या तालुक्याला रेशन दुकान व त्याला जोडलेल्या शिधापत्रिकांची माहिती ‘आॅनलाइन’ भरून पाठवावी लागणार आहे.
रेशन दुकानांचे धान्य मुंबईतून वितरण काळ्याबाजाराला आळा : जितके कार्ड तितकेच धान्य
By admin | Updated: June 21, 2014 00:58 IST