नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याने, धरणांमधील पाण्याच्या पातळीतही वाढ होऊ लागली आहे. निम्म्यापेक्षा अधिक धरणांमधील पाण्याची पातळी ९० टक्क्यांच्या पुढे गेल्याने विसर्गला सुरुवात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सहा धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. रविवारी सकाळपासून गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरण समूहात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली असल्याने, दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. रविवारी दुपारी १२ वाजेपासून दारणासह कडवा, आळंदी, वालदेवी, नांदुरमध्यमेश्वर, तसेच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दारणामधून १०,०६०, कडवामधून १,६९६, आळंदीमधून ३०, वालदेवी धरणातून १८३ , नांदुरमध्यमेश्वर येथून १३,४२७ तर गंगापूर धरणातून ५५३ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढत असल्याने, दुपारी तीन वाजेनंतर दारणा धरणातून होणारा विसर्ग १२ हजार ७८८ क्युसेक इतका करण्यात आला. सकाळी एक हजार क्युसेक इतकाच विसर्ग केला जात होता.
धरणांमधून विसर्ग सुरू झाल्याने, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्री उशिरापर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याचीही शक्यता आहे. मागील वर्षी गंगापूर धरणातून जवळपास दोन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली होती. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे. धरण समूहातील इतर धरणांमध्ये अपेक्षित पाणी जमा झाले नसल्याने गंगापूरमधून होणारा विसर्ग मर्यादित राहाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गौतमी, कश्यपी धरणाच्या पाण्याची पातळीत वाढ हेात आहे.