नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने शासनाच्या विविध विभागांकडून विकासकामे, स्वच्छता व सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात येत आहे; मात्र एसटी महामंडळाच्या नाशिकरोड बसस्थानकाला लागलेले अस्वच्छतेचे ग्रहण मात्र अद्याप सुटलेले नाही. यामुळे भाविक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने केंद्र, राज्य शासन, मनपा, पोलीस प्रशासन यांच्याकडून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. स्वच्छता व सुरक्षितेच्या दृष्टीनेदेखील काळजी घेतली जात आहे. एसटी महामंडळ नाशिकरोड बसस्थानकाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारण्यात आली आहे. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराकडून संरक्षक भिंतदेखील उभारण्यात आली आहे. तर बसस्थानकाच्या आवारात वाहतुकीला अडथळा व अडचणीचे ठरणारे मनपाचे गाळे व इतर अतिक्रमण मनपा अतिक्रमण विभागाने नुकतेच जमीनदोस्त केले. यामुळे नाशिकरोड बसस्थानकाचा आवार प्रशस्त झाला आहे. अस्वच्छतेचे आगरनाशिकरोड बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यामानाने स्वच्छतेचे काम होत नसल्याने व कर्मचारीदेखील अपुरे असल्याने बसस्थानक परिसर अस्वच्छतेचे आगर बनले आहे. बसस्थानकाच्या नूतन इमारतीला नामफलक लावलेला नाही. त्या इमारतीत व बाजूला असलेल्या शेडमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी व उभे राहण्यासाठी असलेल्या जागेतदेखील अस्वच्छता आहे. बसस्थानकातील जुनी कॅन्टीन जमीनदोस्त केली. त्या जागेवर कचराकुंडी निर्माण झाली आहे. यामुळे बसस्थानक आवारात सातत्याने दुर्गंधी वाढत व पसरत असल्याने प्रवासी, भाविकांना तोंडाला रुमाल लावून बसची वाट पहावी लागते. तर मनपाने गाळ्यांचे अतिक्रमण काढल्यानंतर रिक्षाचालक पोलिसांसमोरच बसस्थानकाच्या आवारात रिक्षा उभ्या करून प्रवासी भाडे शोधत असतात. मात्र एसटी महामंडळाकडून कुठलीही खबरदारी व काळजी घेतली जात नसल्याने कुंभमेळ्यातही नाशिकरोड बस स्थानकाचे अस्वच्छता व असुरक्षितेचे ग्रहण काही सुटलेले नाही. (प्रतिनिधी)
नाशिकरोड बसस्थानकात अस्वच्छता
By admin | Updated: August 25, 2015 23:42 IST