नाशिक : धार्मिक, कृषी क्षेत्रात अग्रेसर असण्याबरोबरच कलाविश्वातही समृद्ध असलेले नाशिक जगाच्या नकाशावर पोहचावे आणि नाशिककरांनी जोपासलेल्या अभिजात कलेचे अवघ्या जगाला दर्शन घडावे, या उद्देशाने चित्र, शिल्प, नृत्य व संगीत या चार अभिजात कला केंद्रस्थानी ठेवून स्थानिक पन्नास कलावंतांच्या सोबतीने ‘धुंद हवा’ गीताची निर्मिती करण्यात आली आहे.दवप्रभा प्रॉडक्शनच्या वतीने सुमारे वर्षभर ‘चित्र, शिल्प, नृत्य व संगीत’ या संकल्पनेच्या आधारे शहरातील गोदाघाटापासून तर इगतपुरीच्या विपश्यना केंद्रापर्यंत आणि गंगापूर धरणापासून तर गोंदेश्वर मंदिरांपर्यंत चित्रीकरण करत सुमारे पन्नास कलावंतांच्या सोबतीने ‘धुंद हवा’ हे गीत साकारण्यात आले. या गीताचे प्रथमच बुधवारी (दि.२४) यशवंतराव चव्हाण सायन्स तारांगणामध्ये सादरीकरण करण्यात आले. प्रॉडक्शनच्या प्रमुख व गीताचे दिग्दर्शक प्रा. वृंदा भार्गवे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधत ‘धुंद हवा’ निर्मितीचा प्रवास उलगडला. या गीताची रचना मिलिंद गांधी यांनी केली, तर प्रशांत महाबळ यांनी त्यांच्या रचनेला संगीताचा साज चढविला आणि मीना निकम, ज्ञानेश्वर कासार, आशिष रानडे या गायकवर्गाने स्वरसुरांची जोड दिली. या सर्व पडद्यामागील कलाकारांच्या प्रयत्नांना अचूक वास्तववादी छायाचित्रणाच्या माध्यमातून फणिंद्र मंडलिक व मार्मिक गोडसे यांनी यशस्वी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या गीताच्या निर्मितीला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून प्रारंभ झाला. छायाचित्रणाला प्रत्यक्ष जानेवारी महिन्यात प्रारंभ करण्यात आला. वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर नाशिकची ‘धुंद हवा’ अस्तित्वात आल्याचे भार्गवे यांनी यावेळी बोलताना सांगितले. गुरुवारपासून (दि.२५) हे गाणे यू ट्यूब, गुगलवर उपलब्ध होणार आहे. सदर गीत हे साडेपाच मिनिटांचे असून या गीताच्या रचना स्त्री-पुरुष गायकांनी स्वरबद्ध केल्या आहेत. ध्वनी व छायाचित्रणाची सांगड घालत नाशिकरांसाठी गीत साकारले आहे. या गीताच्या माध्यमातून नाशिकचे गुणी कलावंतांची जगाला ओळख होणार आहे. सदर गीतासाठी कुठलेही प्रायोजक घेण्यात आले नसून सर्व नागरिकांना सदर गाणे विनामूल्य उपलब्ध राहणार असल्याचे भार्गवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नाशिकच्या कलाविश्वाची अनुभूती देणारी ‘धुंद हवा’
By admin | Updated: August 25, 2016 00:15 IST