▪️त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण : निधीअभावी खोळंबली रस्त्यांची कामे
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण पट्ट्यातील रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळे अतिशय बिकट झाली असून खड्ड्यांमुळे चाळण झालेले रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत; मात्र गेल्या पाच वर्षांपासून संबंधित विभाग याकडे सफाईने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तर कोरोनामुळे रस्ते कामांना निधी उपलब्ध नसल्याचे कारण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिले जात आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव-श्रीघाट मार्गावरील मुख्य रस्त्याला एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात श्रीघाट ते देवगाव या मुख्य मार्गावर सध्या सकाळ संध्याकाळ धुके पसरलेले असल्याने या मार्गावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
परिणामी वाहनांचा अंदाज न आल्याने किंवा रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघात घडून येतात. तसेच पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवताना त्रेधातिरपीट उडते. अनेकवेळा अपघात देखील झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता गायब होऊन फक्त खड्डेच दिसत असल्याने वाहनचालकांना खड्डे चुकविण्याऐवजी रस्ता शोधावा लागत आहे.
तसेच एरव्ही वीस मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी आता तासाभराचा अवधी वाया जात असल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह प्रवासी, वाहनचालक करत आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. अतिपावसामुळे येथील रस्ते देखील वारंवार खराब होत असतात. दरवर्षी तालुक्यांतील विविध रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असतात. सामुंडी ते कोजुली या पाच किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था खड्ड्यांमुळे बिकट झाली असून दुचाकी, खासगी वाहने खड्ड्यांमुळे खिळखिळी झाली आहेत. तर रोजचे नोकर- चाकर व्याधींनी ग्रस्त झाले आहेत.
देवगाव परिसरातील देवगाव-वावीहर्ष, देवगाव श्रीघाट, टाकेदेवगाव- येल्याचीमेट, टाकेदेवगाव- वावीहर्ष या मार्गांवरील रस्त्यांना मोठे खड्डे पडले असून दिशादर्शक फलक नादुरुस्त झाले आहेत. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी अक्षरशः खड्ड्यांमध्ये पावसामुळे तळे साचून रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
देवगाव फाट्यावरील त्रिफुली गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नादुरुस्त असून लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. पाच वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांचे काम करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्यांची चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
दुरवस्था झालेल्या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपाचे खड्डे बुजवून मलमपट्टी केली जाते; मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्यांची अवस्था जैसे थे राहते. सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था नाजूक झाल्याने छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत तर काहींना प्राणाला मुकावे लागले.
कोट...
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्याच्या प्रारंभी खड्डे बुजविण्याचे काम झाले; मात्र ज्या ठेकेदारांना हे काम दिले होते त्यांनी योग्य पद्धतीने खड्डे न बुजवता काम केले. छोटे छोटे खड्डे बुजविले असून मोठमोठे खड्डे बुजविण्यास असमर्थ राहिले त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था जैसे थे झाली.
- कृष्णा दमा वारे, देवगाव.
या रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पावसाळ्यामुळे रस्त्याची कामे रखडली आहेत. कोरोनामुळे रस्त्यांना निधी उपलब्ध नसल्यामुळे कामे रखडली. या रस्त्यांची कामे मंजूर असून ठेकेदारांकरावी पाऊस उघडताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.
- यशपाल ठाकूर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग. (०८ देवगाव)
080921\08nsk_23_08092021_13.jpg
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण .