सिन्नर : देशातील नागरिक स्वाक्षरी करण्यापुरते साक्षर होऊन उपयोग नाही, तर सुसंस्कृत झाले पाहिजेत. त्यासाठी आगामी काळात रोटरी क्लबच्या माध्यमातून सुशिक्षित व सुसंस्कृत नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट गर्व्हनर दादासाहेब देशमुख यांनी केले. सिन्नर रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ येथील साईशाहू हॉटेलच्या प्रांगणात पार पडला. त्यावेळी देशमुख बोलत होते. रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष सोमनाथ वाघ, मावळते सचिव राजेश वाजे, नूतन अध्यक्ष अनिल काळे, नूतन सचिव प्रमोदसिंग व्यासपीठावर उपस्थित होते. पोलिओ मुक्त भारत हे रोटरीचे स्वप्न आहे. त्यासाठी रोटरीने गेल्या काळात मोठे योगदान दिले आहे. पोलिओ मुक्तीनंतर देशातील निरक्षरता दूर करण्यासाठी व देश शंभर टक्के साक्षर करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली. रोटरीच्या जिल्हा शाखेचे हे रजत वर्ष असून, त्यानिमित्ताने वर्षभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्ह्यातील रोटरीच्या सभासदांची संख्या एक हजारपर्यंत वाढविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. याप्रसंगी रोटरीच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सनदी लेखापाल अभिजित गुजराथी यांनी नव्याने क्लबमध्ये प्रवेश देण्यात आला. सुनील भडांगे व किरण मुत्रक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी नाशिक रोटरीचे जी. एम. जाधव, डॉ. आशिष चौरासिया, रूपेश झटकारे, सुधीर रावले यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते. कैलास क्षत्रिय व स्मिता आणेराव यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)