पंचवटी : पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणे, तसेच वाहतूक शाखेत कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी लोटूनही बदली झालेले कर्मचारी मूळ जागेवरच असल्याने कर्मचाऱ्यांना बदलीस्थळावर जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची अशीच परिस्थिती असून, या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतरदेखील काही कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आलेले नाही. बदली झाल्यानंतरदेखील पोलीस ठाणे वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना पूर्वीच्याच जागेवर काम करावे लागत असल्याने या पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तालयातील बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे गॅझेट दुरुस्तीनंतर पुन्हा प्रसिद्ध करण्यात आले. मात्र आधी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप सोडलेले नसल्याने या नवीन कर्मचाऱ्यांना कधी सोडणार हा प्रश्नच आहे. बदली झालेली असतानाही कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडले नसल्याने वरिष्ठांकडून एकप्रकारे मानसिक छळ केला जात असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांत सुरू आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मोर्चे, पोलीस भरती तसेच अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठीचा बंदोबस्त या कारणावरून सोडण्यात आले नसल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)