नाशिक : परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या आंदोलनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका विशद केली. यासंबंधात संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुंबई येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्याबाबत अद्याप मंत्रिमंडळात कोणतीही चर्चा झालेली नाही. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी त्याची चर्चा व्हावी आणि त्यानुसार त्या रकमेचे वाटप कधी होणार हे जाहीर करावे, या प्रमुख मागणीबरोबरच प्रवासी कर कमी करावा, डिझेलच्या दरात वारंवार होणारी वाढ, सुट्या भागांच्या किमतींमध्ये होणारी वाढ, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न, खासगी अवैध वाहतूक या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विभागीय सचिव प्रमोद भालेकर, विभागीय अध्यक्ष सुधाकर वाकचौरे, प्रादेशिक सचिव विजय पवार, कार्याध्यक्ष शिवाजी ढोबळे, प्रसिद्धी सचिव भूषण पाराशरे, खजिनदार विकास आंधळे यांसह पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)