देवळा : तालुक्यातील वरवंडी येथे गुरुवारी रात्री बिबट्याने एका शेतकऱ्याची गाय फस्त केल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, सदर बिबट्याचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.देवळा वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून, सदर शेतकऱ्यास वनविभागाकडून शासकीय नियमानुसार नुकसानभरपाई देण्यासाठी शवविच्छेदन अहवालासह आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यास सांगितल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. पालेपवाड यांनी सांगितले.वरवंडी गावाशेजारी शेतावर राहणाऱ्या भाऊसाहेब मोतीराम अहेर या शेतकऱ्याची घराजवळ बांधलेली गाय गुरुवारी (दि. ११) रात्रीच्या सुमारास बिबट्याने डोंगराच्या दिशेने नेऊन फस्त केली. दरम्यान, याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला कळविल्यानंतर देवळा वनविभागाचे वनपाल ए. के. भालेराव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व घटनास्थळाचा पंचनामा केला.सध्या शेतकऱ्यांना लोडशेडिंगमुळे रात्रीच्या वेळी आपल्या पिकांना पाणी द्यावे लागते; परंतु बिबट्याच्या वास्तव्य असल्याने या भागात दहशतीचे वातावरण असून, वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)
बिबट्याच्या बंदोबस्ताची ग्रामस्थांची मागणी
By admin | Updated: February 14, 2016 23:23 IST