नाशिकरोड : गेल्या तीन वर्षांपासून आर्थिक अडचणींमुळे बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करावा, या मागणीचे निवेदन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले.पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नासाका बंद पडल्याने १७ हजार सभासद व ऊस उत्पादकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सभासद व कामगारांनी भाडेतत्त्वावर का होईना हा कारखाना सुरू व्हावा, यासाठी सर्वांचे एकमत केले असून, त्याला आता शासनाचे पाठबळ हवे आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊस मुबलक उपलब्ध असताना चारही तालुक्यांच्या दृष्टीने गरजेचा असलेला नासाका सुरू होणे गरजेचे आहे. राज्य शासनाने जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून खासगी स्तरावर का होईना कारखाना चालविणेस देणेबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली कामगार युनियन अध्यक्ष विष्णुपंत गायखे, त्र्यंबकराव गायकवाड, दत्ता गायकवाड, शिवराम गायधनी, शंकर रोकडे, नामदेव बोराडे, मोतीराम तिदमे, शरद पगार, खंडेराव गायधनी, रमेश औटे, शिवाजी म्हस्के, मधुकर सातपुते, अशोक खालकर, नीलेश दिंडे आदिंच्या शिष्टमंडळाने याबाबत चर्चा केली. (प्रतिनिधी)
नासाका पुन्हा सुरू करण्याची मागणी
By admin | Updated: May 22, 2016 22:40 IST