इगतपुरी : तालुक्यात गेल्या काही दिवसात सर्वात जास्त बेमोसमी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले असून, शासनाने त्वरित भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी केली आहे.बेमोसमी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. तालुक्यातील सांजेगाव, गोंदे दुमाला, मुरंबी, बेलगाव, कुऱ्हेगाव, नांदगाव, जाणोरी, साकूर, शेणित, घोटी खुर्द, धामणगाव परिसरात भाताच्या सोंगण्या जोरात सुरू असून, अजूनही भात शेतात कापणी करून पडलेले आहे. तर अनेक शेतकऱ्यांचे भात झोडून खळ्यावर पसरलेला आहे. अशा वेळी अचानक झालेल्या पावसाने भाताच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे. आधीच भाताचे बाजारमूल्य घसरलेले असताना ओल्या झालेल्या भाताचे आयतेच निमित्त घोटीच्या व्यापाऱ्यांना मिळाले आहे.झालेल्या पावसामुळे चाराही खराब झाला आहे, तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे बियाणे टाकले होते. त्यात टमाटे, फ्लावर, काकडी या पिकांचेही नुकसान झाले आहे. भात उत्पादक शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले. शेतकरी ज्या पिकाच्या भरवशावर संपूर्ण वर्षाचे नियोजित जीवन जगायचे तेच मुख्य पीक वाया गेले आहे. ज्या काही ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांनी भात सोंगला त्याला ही योग्य भाव मिळत नाही.तहसीलदारांनी सर्व तलाठींना व कृषी अधिकाऱ्यांना सूचना देऊन ताबडतोब नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भाताचे पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी केली आहे. (वार्ताहर)
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
By admin | Updated: November 25, 2015 23:57 IST