नाशिकरोड : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेला नाशिक साखर कारखाना सुरु करण्यासाठी शासनाने थकहमी स्विकारावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.नाशिकच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नासाका कामगार युनियनचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, कार्याध्यक्ष शिवराम गायधनी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. गेल्या तीन वर्षापासून नासाका बंद पडल्याने सभासद, उस उत्पादक, कामगार, ट्रक मालक, चालक व इतर सह व्यवसायिक यांच्यावर उपासमारीचे वेळ आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज थकल्याने नवीन कर्ज पुरवठा होऊ शकत नाही यामुळे कारखाना सुरु होण्यास अडचण निर्माण झाली आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र चार तालुक्यातील २१७ गावांचे आहे. कार्यक्षेत्रात मुबलक उस उपलब्ध असून कामगारांची संख्या देखील कमी आहे. या सर्व बाबी कारखान्याच्या जमेच्या बाजू असून शासनाने कारखाना सुरु करण्यासाठी थकहमी स्विकारावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच लक्ष घालू असे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सिमा हिरे, देवयाणी फरांदे, बाजीराव भागवत, प्रकाश घुगे, शिवराम गायधनी, सुनिल आडके, निलेश दिंडे, दिलीप गायधनी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नाशिक साखर कारखाना सुरू करण्याची मागणी
By admin | Updated: September 12, 2016 01:13 IST