सिन्नर : तालुक्यात सलग चौथ्या वर्षीही पावसाने पाठ फिरवल्याने यंदा भयावह दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामही धोक्यात सापडला आहे. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नाने उगरूप धारण केल्याने तालुक्यात तातडीने चारा डेपो व चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पशुधन वाचविण्यासाठी शासनाने तातडीने छावण्या व चारा डेपो सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात येत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात चाराटंचाईची अधिक तीव्रता वाढू लागली आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले आहे. रोहिणी, मृग, आर्द्रा ही तीन चांगल्या पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने खरिपाचा हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यात यंदा शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामातील पेरण्यासाठी ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तथापि, खरीप हंगामातील सोयाबीन, मका व कडधान्याच्या वाणांच्या पेरणीचा हंगाम १५ जुलैपर्यंत असल्याने या पिकांची पेरणी जवळपास होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या तालुक्याच्या काही भागांत रिमझिम स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत. त्या पश्चिम भागातील शेतकरी पेरण्या सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मात्र बाजरी व मका या व्यतिरिक्त कडधान्याच्या पिकांची पेरणी होणे शक्य नसल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)