नरेश हाळणोर
नाशिकयंदा जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही कोकण व मुंबई वगळता राज्यात पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावते आहे. नाशिक विभागात सुमारे साडेपाचशे पाण्याचे टॅँकर सुरू असून, यात नगर जिल्हा आघाडीवर तर त्यापाठोपाठ नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातील दोनशे गावांची तहान भागविण्यासाठी १८१ पाण्याचे टॅँकर रात्रंदिवस फेऱ्या मारत असून, यात मागणी वाढत असल्याने दिवसागणिक भरही पडते आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देणेही प्रशासनाला कठीण जाणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. यावेळी जून महिन्यात राज्यात कोठेही समाधानकारक पाऊस झाला नसून जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण आणि मुंबई वगळता इतरत्र पावसाने ओढच दिल्याने पाण्याची समस्या नाशिक विभागात निर्माण झाली आहे. विभागातील पाच जिल्ह्यांपैकी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातच सर्वाधिक पाण्याचे टॅँकर सुरू आहेत. उर्वरित धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात नाममात्र टॅँकर सुरू आहेत. नगर जिल्ह्यामध्ये सुमारे २५२ गावे आणि ११७८ वाड्यांना ३२१ टॅँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे, तर नाशिक जिल्ह्यात ४७ गावे व २४४ वाड्यांना १८१ टॅँकरने पाणीपुरवठा होतो आहे. येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास पाण्याची टंचाईची तीव्रता वाढून टॅँकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयांकडून जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी मागणीच्या तुलनेत टॅँकर उपलब्ध करून देण्याची समस्या प्रशासनाला आत्ताच भेडसावते आहे.