घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधारने सरासरीपेक्षा निम्म्याहून अधिक आकडेवारी गाठली असून, तालुक्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असल्याने याचा परिणाम तालुक्यातील उद्योग व्यवसायावर झाला आहे.पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात गेली तीन दिवसांपासून मुसळधार सुरू असून, तालुक्यातील सर्व नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत, तर नदीचे पाणी लगतच्या भातशेतीत दूरवर गेल्याने भात लागवड केलेले क्षेत्र संकटात आले आहे. दरम्यान या पावसाने गेली तीन दिवसापासून थोडीही उसंत न दिल्याने सर्व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे तालुक्यात असणाऱ्या धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, आठ दिवसांपासून भावली धरण फुल्ल भरून वाहत असताना हे पाणी दारणा धरणात येत असल्याने दारणा धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. (वार्ताहर)
दारणाचे पाणी भातशेतीत
By admin | Updated: August 2, 2016 00:43 IST