नाशिक : महापालिकेने दारणा धरणातील पाणी उपसा केंद्राची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना केल्यानंतर गेल्या २०-२५ दिवसांपासून संपूर्ण नाशिकरोड विभागाला आता दारणातून पाणीपुरवठा केला जात असून, त्यामुळे गंगापूर धरणातून होणाऱ्या पाण्याची बचत होण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत दारणातून दररोज सुमारे दीड दलघफू पाणी उचलले जात आहे. महापालिकेने दि. २० एप्रिल अखेर दारणातून १४१.५८ दलघफू पाणी उचलले आहे, तर १५८.४२ दलघफू पाणी उचलता येणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातील २७००, तर दारणा धरणातील ५०० दलघफू पाणी आरक्षित केले. परंतु सदर पाणी आरक्षण अपुरे ठरणार असल्याने बऱ्याच वाद-प्रतिवादानंतर जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातील आणखी ३०० दलघफू पाणी आरक्षण वाढवून दिले. दारणातील ५०० दलघफू पाणी आरक्षित ठेवूनही त्याचा उपभोग महापालिकेला तांत्रिक अडचणींमुळे घेता येत नव्हता. नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रावर दारणा नदीवरील पाणी पंपिंग करून पोहोचविण्यात येते. याठिकाणी दारणा-वालदेवी नदीचा संगम असल्याने पाण्याची अपेक्षित गुणवत्ता मिळत नाही. तसेच दारणा नदीचे पाणी जुन्या असलेल्या दोन जॅकवेलपर्यंत पोहोचविण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे पंपिंग मशिनरीची क्षमताही मर्यादितच आहे. गेल्या दहा वर्षांत दारणातून केवळ २०० दलघफूच्या आसपास पाणी उचलण्यात आले आहे. दारणातील पाणी उपसा केंद्राची क्षमता पाहता दारणातून ५०० दलघफू आरक्षण देण्याऐवजी तेथून २०० दलघफू पाणी द्यावे आणि उर्वरित ३०० दलघफू पाणी गंगापूर धरणातून उचलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर अशोक मुर्तडक यांनी शासनाकडे केली होती. दरम्यान, दारणातील पाणी उपसा केंद्राची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याचा विषय महासभेत चर्चिला गेल्यानंतर प्रशासनाने त्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेतले आणि अल्पावधीतच कामे पूर्ण केली. त्यानंतर गेल्या २०-२५ दिवसांपासून नाशिकरोड विभागाला आता केवळ दारणा धरणातूनच पाणीपुरवठा केला जात असून, सप्ताहात दारणातून सुमारे ९ दलघफू पाणी उचलले जात आहे. दारणा व गंगापूर धरणांतून महापालिकेकडून सध्या सरासरी १० दलघफू पाणी उचलले जात आहे. दारणातून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरू झाल्याने गंगापूर धरणातील पाण्याची बचत होण्यास मदत होत असून, प्रशासनाला ३१ जुलैपर्यंत नियोजन करणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)
नाशिकरोडला दारणाचे पाणी
By admin | Updated: April 24, 2016 00:01 IST