इंदिरानगर : श्रद्धाविहार कॉलनीस पावसाचे पाणी व भूमिगत गटारीतील पाण्याने विळखा घातल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यातून मार्ग काढणे तारेवरची कसरत ठरत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.श्रद्धाविहार कॉलनीत सुमारे दीड हजार वस्तीच्या भागात माध्यमिक, नर्सिंग व अध्यापन विद्यालय आहे. त्यामुळे येथून विद्यार्थी ये-जा करतात. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने भूमिगत गटारीचे चेंबर चोकअप झाले. त्यामुळे पावसाचे पाणी आणि भूमिगत गटारींचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत ते लगतच्या मोकळ्या भूखंडांवर पसरले आहे. रस्त्यावरील पाण्यातून विद्यार्थ्यांना पायी आणि सायकलवरून मार्ग काढणेसुद्धा जिकिरीचे झाले आहे. मनपा प्रशासन परिसराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)
श्रद्धाविहार कॉलनीत दुर्गंधीयुक्त पाणी
By admin | Updated: August 2, 2014 01:21 IST