दिंडोरी : मनमाड व येवला येथे सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी पालखेड धरणाच्या डाव्या कालव्यातून शनिवारी दुपारी ४ वाजता पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्यात आले. कडक पोलीस पहाऱ्यात पाणी येवला मनमाडच्या साठवण बंधाऱ्यात नेण्यात येणार आहे.यंदा पाऊस कमी पडल्याने तालुक्यातील सर्वच धरणांत अत्यल्प साठा असून, कादवाचे नदीपात्र प्रथमच कोरडे पडले आहे. मनमाड व येवला शहराला पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. अखेर शनिवारी आवर्तन सोडले असून, ३३० क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. पालखेड धरणात अवघा ३७५ द.ल.घ.फू. साठा शिल्लक आहे तर इतर धरणातही अल्प साठा आहे. दरम्यान, पाण्याची चोरी होऊ नये म्हणून प्रशासनाने पोलिसांची मदत घेऊन बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथकही तैनात करण्यात आले आहे. (वार्ताहर)
पालखेडच्या कालव्यातून सोडले आवर्तन
By admin | Updated: September 8, 2015 00:10 IST