वडांगळी : सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागात गेल्या तीन वर्षांपासून एकही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्याचीच यंदाही पुनरावृत्ती होत आहे. केवळ पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे देव नदीला पाणी आले होते. मात्र ते आता बंद झाले आहे. नदीकाठच्या शिवाराला थोडाफार फायदा झाला, मात्र पावसाच्या पाण्यावरील खरीप हंगामातील पिके सध्या उन्हाच्या तीव्रतेने धोक्यात सापडली आहेत. या भागातील खडांगळी, वडांगळी, कीर्तांगळी, कोमलवाडी, मेंढी, चोंढी, निमगाव, पंचाळे, धनगरवाडी आदि भागांतील गावे कडवा कालव्याच्या सिंचन लाभ क्षेत्रात येत आहेत. या भागात आठमाही सिंचनाची व्यवस्था झाली आहे. मात्र कडवाचे आवर्तन वेळेवर सुटले नसल्याने शेतकऱ्यांना ते पाणी पिकांना देता आले नाही. या व्यतिरिक्त केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जिरायती भागातील खरीप हंगामातील पिकांना सध्या पाण्याची गरज आहे.
पिके सध्या उन्हाच्या तीव्रतेने धोक्यात
By admin | Updated: October 7, 2014 00:48 IST