पिळकोस ...
सलग तीन वर्षांपासून कमी पाऊस आणि तीव्र उन्हाळा असला तरी, शेतकऱ्यांनी इतर पिकांना फाटा देत डाळींब बहार घेतला मात्र गारपीट व त्यानंतरच्या अवकाळी पावसाने व सततच्या बदलत्या हवामानाने पिकाचे नियोजन कोलमडले. जमिनीत उष्णता वाढल्याने अनेक बागांमध्ये तेल्या धडकला. त्यामुळे पिळकोस, विसापूर, चाचेरसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बागांवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा निघेनासा झाला आहे. झाडांवरील रोगग्रस्त फळे तोडून त्यांची विल्हेवाट शेतकऱ्यांना लावावी लागत आहे. पिळकोस येथील माजी सरपंच भालचंद्र वाघ यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रावरील दोन हजार झाडांवर उत्पन्न न घेताच नांगर फिरविला.