नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणीस तीन दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच पोलीस व प्रशासनाच्या अतिरेक्याचा नाशिककरांसह साधू-महंतांना फटका बसू शकतो, हे लक्षात आल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना मंगळवारी (दि.२५) कृषी उत्पन्न बाजार समिती तीन दिवस बंद न ठेवता नाशिककरांची व साधू-महंतांच्या आखाड्यांची भाजीपाल्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंची गैरसोय करू नये, असे आदेश दिल्याचे वृत्त आहे.मंगळवारी (दि.२५) मुंबईत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे व आमदार सीमा हिरे यांचे पती महेश हिरे यांनी मंत्रालयात जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. २८ ते ३० आॅगस्टदरम्यान बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने बाजार समितीला दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन दिवस त्यांचा शेतमाल बाजार समितीत आणता येणार नाही. त्यामुळे नाशिककरांची व साधुग्राममधील साधू- महंतांची भाजीपाल्याची प्रचंड गैरसोय होणार असल्याचे पिंगळे व हिरे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तीन तीन दिवस शेतकरी त्यांचा शेतमाल कसा घरात अथवा मळ्यात ठेवू शकतील. तो नाशवंत असल्याने भाजीपाल्याचे नुकसान होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काल सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना बाजार समिती तीन दिवस बंद न ठेवण्याचे आदेश दिले. मात्र रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याची माहिती सभापती देवीदास पिंगळे यांनी दिली. (प्रतिनिधी)
बाजार समिती सुरूच ठेवा; पालकमंत्र्यांचे आदेश
By admin | Updated: August 26, 2015 00:23 IST