मालेगाव : शहरातील वीज वितरणाचा ठेका खासगी कंपनीला देऊ नये यासाठी आॅक्टोंबर २०१८ पासून विरोध करीत आहे. मात्र आमदार या प्रश्नावर गप्प आहेत. त्यांनी या प्रश्नावर विधानसभेत तसेच बाहेर कोठेही प्रश्न उपस्थित केले नाहीत. उलट त्यांनी खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकांशी तडजोड केल्याची टीका माजी आमदार आसिफ शेख यांनी येथील पत्रकार परिषदेत केली.वीज चोरी मोठया प्रमाणात होत असलेल्या महापालिका क्षेत्रातील वीज वितरणाचा ठेका खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय २०१८ मध्ये राज्याच्या ऊर्जा विभागाने घेतला. मालेगावात ५१ टक्के तूट आहे. उलट वसमत ५७, बीड ५८ व पाथरी येथे ५७ टक्के तूट असूनही तेथे का खाजगीकरण करण्यात आले नाही, असा सवाल शेख यांनी केला कमी तूट असलेल्या मालेगाव, मुंब्रा-कळंब व अकोला या तीन महापालिका क्षेत्रात मोठया प्रमाणात वीजचोरी होत असल्याने येथील वीज वितरणाचा ठेका खाजगी कंपनीला देण्यासाठी तत्कालीन युती शासनाने टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निर्णय प्रक्रि येतून अकोला वगळण्यात आले. यासंदर्भात ११ आॅक्टोंबर २०१८ पासून विधानसभेत तसेच बाहेरदेखील वेळोवेळी आवाज उठवला व खाजगीकरणाला विरोध केल्याचे शेख यांनी सांगितले.शहरातील वीज वितरणच्या खाजगीकरणाला कॉँग्रेसचा विरोध असल्याचे सांगून शेख यांनी आमदार गप्प असल्याची टीका केली. यासंदर्भात ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला नगरसेवक अस्लम अन्सारी, शकील जानी बेग, साबीर गौहर, सलीम शेख आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासगी वीज ठेक्याबाबत काँग्रेसची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:09 IST