दिंडोरी : तालुक्यातील हजारो युवकांचा हिरमोड, दंंडुक्याचाही प्रसाद दिंडोरी : भारतीय नौदलाच्या खलाशी (सेलर) पदाच्या भरतीसाठी ऐनवेळी किमान गुणांची अट घातल्याने राज्यातून भरतीसाठी आलेल्या हजारो युवकांचा हिरमोड झाला आहे. युवकांनी तीव्र संताप व्यक्त करत सदर भरती रद्द करून नव्याने भरतीप्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील असंख्य तरुणांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान भरतीप्रक्रियेदरम्यान झालेल्या गर्दीवर नियंत्रण करताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने काही युवक किरकोळ जखमी झाले आहेत.भारतीय नौदलात सामील व्हा म्हणून जाहिरात दिलेल्या नौसेनेच्या खुल्या भरतीप्रक्रियेला हजारो युवकांनी प्रतिसाद दिला. मुंबई येथे मालाड येथील नौसेनेच्या हमलातळावर भरतीसाठी गुरुवारी रात्रीच हजारो युवक राज्यातील कानाकोपऱ्यातून दाखल झाले होते. सदर जाहिरातीत फक्त बारावी विज्ञान उत्तीर्ण अशीच पात्रता दिली होती. मात्र ऐनवेळी ६० टक्कांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या युवकांना प्रवेश दिला जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे ६० टक्केपेक्षा कमी मार्कअसलेल्या राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो युवकांची निराशा झाली. युवकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. याबाबत जबाबदार अधिकारी यांच्याशी संपर्ककरण्यास मज्जाव केला होता. याबाबत विचारणा केली असता पोलिसांकडून अशा युवकांना दंडुक्याचा प्रसाद देत हाकलून लावले जात होते. भरतीसाठी गुरुवारी रात्रीपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या युवकांनी मोकळ्या जागेत रात्र काढली. पहाटे जेव्हा भरतीसाठी रांग लावण्यासाठी युवकांनी गर्दी केली तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीमार केला. त्यात काही युवक जखमी झाले. ऐनवेळी भरतीप्रक्रियेच्या पात्रेतत बदल झाल्याचे झाल्याचे नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर युवकांनी एकच गोंधळ घातला. भरतीप्रक्रियेत ऐनवेळी बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व नवीन भरतीप्रक्रिया राबवावी अशी मागणी युवकांनी केली आहे. (वार्ताहर)
नौदलाच्या भरतीत ऐनवेळी पात्रता बदलल्याने गोंधळ
By admin | Updated: September 10, 2016 00:31 IST