नाशिक - कोरोनाकाळामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यातच थकबाकीची रक्कम आता चारशे कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याने महापालिकेने आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकविणाऱ्या दीड हजार थकबाकीदारांवर महापालिकेने जप्तीचे वॉरंट बजावले आहे. त्यानंतर येत्या २० दिवसांत संबंधितांच्या मिळकतींचे लिलाव करण्यात येणार असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना राबविली जात आहे. त्यामुळे नागरिकांवर कारवाईचा बडगा न उगारता सवलतीचे आकर्षण देऊन वसुलीवर भर दिला जात आहे. गेल्या वर्षी तर कोरोनामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहावर आर्थिक संकट आले. त्यामुळे महापालिकेने अत्यंत संवेदनशीलपणे हा विषय हाताळताना आधी घरपट्टी लवकर भरणाऱ्यांना देण्यात येणारी सूट अगदी जुलैपर्यंत वाढवून दिली. त्यानंतरदेखील सक्ती करण्याऐवजी अभय योजना राबवली; परंतु तरीही भरीव प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे थकबाकीची रक्कम ३९३ कोटींपर्यंत गेली आहे. मार्चअखेर म्हणजेच आर्थिक वर्ष संपण्यास आता अवघे २० दिवस शिल्लक असून थकबाकीसाठी यापूर्वी राबविलेल्या योजनेच्या माध्यमातून १०३ कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. त्या नियमित घरपट्टीतदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३ कोटी रुपयांची कमी वसुली झाली आहे. त्यामुळे एक लाखापेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या दीड हजार थकबाकीदारांना जप्ती वारंट बजावण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत ८० जणांना जप्ती वारंट बजावण्यात आले असून याच महिन्यात त्यांच्या मिळकतींचे लिलाव करण्यात येणार आहेत. त्यामुळे थकबाकी वसुली झाली तर ठीक; अन्यथा मिळकतींवर महापालिका एक रुपया भरून स्वत:चे नाव मिळकतींवर लावून नावाचा बोजा चढविणार आहे.
इन्फो....
४ लाख ५७ हजार
एकूण मिळकतींची संख्या
४९६ कोटी
एकूण थकबाकी
१०३ कोटी
आत्तापर्यंतची थकीत वसुली
१५२०
लखपती थकबाकी