सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम भागातील पास्ते व जामगाव या भागात संततधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी दोन गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार सुनील सौंदाणे यांना देण्यात आले आहे. या भागात सतत बारा दिवस सुरू असलेल्या संततधारेमुळे पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही, तर काही शेतकऱ्यांची अंकुरलेली पिके सडून गेली आहेत. परिसरातील सुमारे दीडशे एकर क्षेत्रावर बाजरी, भूईमूग, सोयाबीन, मका व विविध भाजीपालावर्गीय पिकांची पेरणी केली होती. जुलैच्या शेवटच्या तर आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात संततधार पाऊस सुरू राहिला होता. सलग बारा दिवस पाऊस सुरू राहिल्याने पिके सडून गेली असून, उशिरा पेरणी केलेले बियाणे कुजले आहे. त्यामुळे दीडशेहून अधिक एकरातील शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीची गरज असून, त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. (वार्ताहर)
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी
By admin | Updated: August 21, 2014 00:13 IST