नाशिक : जिल्ह्यातील नागरिकांसाठी पाण्याची काळजी वाहणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयालाच भीषण पाणीटंचाईने वेढले असून अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी पदरमोड करून तहान भागवावी लागत आहे. निव्वळ पाण्यापुरतेच जिल्हाधिकारी कार्यालय त्रस्त नसून, स्वच्छतागृह, स्वच्छता व आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागत असताना त्याकडे मात्र प्रशासन प्रमुखांना लक्ष देण्यास वेळ नसल्याची तक्रार केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या विविध शाखांबरोबरच, कार्यालयाच्या आवारात लेखा-कोषागार, तलाठी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती, माजी सैनिक विश्रामगृह, स्टॅम्प वेंडर कक्ष, माजी सैनिक कार्यालय, स्टेट बॅँक, दुय्यम सह निबंधक, जिल्हा ग्राहक मंच, सेतू केंद्र अशी डझनभर कार्यालये कार्यरत आहेत. नागरिकांना दैनंदिन शासकीय कामकाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य कार्यालयांमध्ये यावे लागते, त्यामानाने सोयी-सुविधांची कमतरता आहे. येणारे नागरिक व कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था संपूर्ण आवारात कुठेच करण्यात आलेली नाही, उलट उद्यानाला देण्यासाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मध्यंतरीच्या काळात नागरिकांसाठी स्टॅण्ड पोस्टची व्यवस्था करण्यात आली व त्यावर लाखो रुपये खर्चही करण्यात आले, परंतु स्टॅण्ड पोस्टच्या टाकी व नळाला एकही थेंब पाणी अखेरपर्यंत आले नाही तर पूर्वीपासून असलेले तीन नळ कनेक्श्नही खंडित करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना कार्यालयात येताना घरूनच पाण्याच्या बाटल्या आणाव्या लागतात, तर काही अधिकाऱ्यांना अभ्यागतांसाठी पदरमोड करून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. पिण्यासाठीच पाणी नसल्यामुळे स्वच्छतागृहांसाठीही पाणी नसल्याने त्यातून दुर्गंधी व रोगराईला आमंत्रण मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बीओटी तत्त्वावर सुलभ शौचालय बांधण्यात आलेले असले तरी, सायंकाळी सहा नंतर ते कुलूप बंद होत असल्यामुळे त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शासकीय कामकाजासाठी थांबणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृहासाठी उघड्यावरच कार्यभार आटोपावा लागत आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी कार्यालय तहानलेले
By admin | Updated: May 6, 2016 00:15 IST