नाशिक : गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाच्या हजेरीनंतर वाढलेल्या थंडीने मध्यंतरी मुक्काम हलविल्यानंतर तीन दिवसांपासून ही थंडी पुन्हा परतली आहे. दिवसभर ऊन असले, तरी पहाटे आणि रात्रीच्या सुमारास चांगलीच थंडी पडू लागली आहे. दोन दिवसांपासून शहराच्या तपमानात घट होत असून, रविवारी पारा नीचांकी ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. परिणामी, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. दिवाळीनंतर थंडीवर मध्य समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर आलेल्या पावसाने परिणाम झाला होता. त्यामुळे थंडी वाढली होती. याचदरम्यान उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले होते. या सर्वांचा परिणाम म्हणजे थंडी अचानक गायब झाली होती. शहराचे किमान तपमान १९ ते २० अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली होती; मात्र काही दिवसांपासून थंडीचा जोर पुन्हा वाढू लागला आहे. शनिवारी शहराचे किमान तपमान ११, तर रविवारी १२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. रात्री व पहाटे बोचरी थंडी जाणवत असल्याने रस्त्यांवरील वर्दळीत घट झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली ऊबदार कपड्यांच्या दुकानांतील गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आगामी ३ ते ४ दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, त्यानंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
थंडी पुन्हा परतली
By admin | Updated: December 1, 2014 01:06 IST