लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले जाण्यात महापालिकेची एकूणच आरोग्य व स्वच्छताविषयक ढिसाळ यंत्रणाच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छतेसंबंधीची प्रश्नपत्रिका सोडविताना नाशिककरांनीच मनपाच्या अव्यवस्थेवर फुली मारली असून, सर्वांत कमी म्हणजे अवघे ४६ टक्के गुण मिळाले आहेत. त्याचाच फटका सर्वेक्षणात महापालिकेला बसला आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नाशिकचा क्रमांक घसरल्याने महापालिकेचा एकूणच गलिच्छ कारभार देशभर जाऊन पोहोचला आहे. क्रमांक घसरल्याने महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची संधी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही सोडलेली नाही. शहरी विकास मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत २००० गुणांची परीक्षा घेतली होती. त्यात ११०६ गुण प्राप्त होऊन देशातील ४३४ शहरांमध्ये नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले. सदर परीक्षा तीन स्तरांवर घेण्यात आली होती. केंद्र सरकारचे खास पथक त्यासाठी नाशिकला येऊन गेले होते. पथकाने शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, उद्याने, खतप्रकल्प, बसस्थानके, झोपडपट्टी परिसर, भुयारी गटारी, गोदावरी नदीपात्रात होणारे प्रदूषण यांची प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली होती शिवाय घरोघरी जाऊन नागरिकांशीही संवाद साधला होता.
स्वच्छतेच्या पेपरवर नाशिककरांचीच फुली
By admin | Updated: May 6, 2017 02:02 IST