राजीव वडगे संगमेश्वरसलग आलेल्या सुट्यांमुळे शासकीय कार्यालये, बँकांचे व्यवहार बंद झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विविध धर्मीयांचे सणवार, महापुरुषांची जयंती यामुळे शासकीय कार्यालये बंद असल्याने सामान्य नागरिकांची कामे खोळंबण्याचे प्रकार होत आहेत. बँका बंद झाल्याने पैशांचे देवाण-घेवाणीचे व्यवहारही ठप्प झाले. एटीएमवर रांगा लागल्या. परिणामी तेथील रोकड संपल्याने एटीएम बंदचे बोर्ड लावण्याची वेळ बँक प्रशासनावर आली.मार्च महिन्यात ६ रोजी रविवार व ७ रोजी महाशिवरात्री, २४ रोजी धूलिवंदन, २५ रोजी ख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे व २६ रोजी चौथा शनिवार व २७ रोजी रविवार अशा सलग सुट्या मिळाल्या. एप्रिल महिन्यात ८ रोजी मराठी नववर्ष व गुढीपाडव्याचा सण, ९ रोजी दुसरा शनिवार, तर १० रोजी रविवारची हक्काची सुट्टी मिळाल्याने सर्वच कार्यालये बंद होत. पुन्हा १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दि. १५ रोजी श्रीराम नवमी व दि. १७ रोजी रविवारची साप्ताहिक सुटी यामुळे नागरिकांची महत्त्वाची कामे खोळंबली. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, पंचायत समिती, कृषी विभाग, टपाल खाते आदि कार्यालये नागरिकांना वारंवार विविध कामांसाठी खेट्या माराव्या लागतात. मात्र सलग आलेल्या सुट्यांमुळे नागरिकांची कामेच थांबली. त्यातच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांची कामे करण्यात निरुत्साहच असतो. त्यात सुट्यांची भर पडल्याने नागरकि अक्षरश: मेटाकुटीस आले होते. सलग सुट्या संपल्यानंतर बँकांमध्ये कामकाजासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्याचे दृश्य होते. वृद्ध, अपंग, महिलांचे तर हाल बघवले जात नाही. त्यातच शहराचे तपमान ४४ अंशाच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त झाले असतानाच सलग सुट्यांचा फटका सहन करावा लागत आहे.
सलग सुट्यांमुळे नागरिकांना ताप
By admin | Updated: April 18, 2016 00:23 IST