नाशिक : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी कालपर्यंत महापालिकांच्या विभागीय कार्यालयाबाहेर अर्जासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांनी सोमवारी सकाळी तलाठी कार्यालयाला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वेढा दिला. त्यामुळे तलाठी कार्यालयाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊन अखेर सेतू कार्यालयामार्फत अर्ज सादर करण्याचा सल्ला देऊन तलाठ्यांनी आपली मान सोडवून घेतली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरकुलासाठी उत्पन्नाची अट घालण्यात आली असून, अत्यल्प उत्पन्न गटालाच यात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अर्जात नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे वार्षिक उत्पन्नाचा दाखला अर्जासोबत जोडावा लागणार असल्यामुळे सोमवारी सकाळी शेकडो नागरिकांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील तलाठी कार्यालयाला धडक दिली. अचानक शेकडोच्या संख्येने आलेल्या नागरिकांनी तलाठी कार्यालयातून वार्षिक उत्पन्नाचा दाखला अथवा शिफारस मिळण्याची मागणी केली. उपस्थित तलाठ्यांनी त्यांना अशा प्रकारे दाखल देता येत नसल्याचे सांगूनही नागरिकांचे समाधान होत नसल्याने काही काळ प्रचंड गोंधळ उडाला. पंतप्रधान आवास योजनेच्या अर्जातच वार्षिक उत्पन्न दाखला जोडण्यासाठी व त्यासाठी तलाठी कार्यालयातून दाखला आणण्याचा उल्लेख असल्याचा दावा अर्जदारांकडून केला गेला. वार्षिक उत्पन्न स्वयंघोषणेवर जाहीर करता येत असल्याची बाबही तलाठी कार्यालयाकडून नमूद करण्यात आली, परंतु नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर सर्वांना सेतू कार्यालयात अर्ज सादर करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर गर्दी निवळली.उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर महिलांनी असा ठिय्या मांडला होता.
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नागरिकांची गर्दी
By admin | Updated: April 4, 2017 01:56 IST