नायगाव : सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षाच्या बालकाचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.अजित नामदेव आव्हाड (९) हा चौथीत शिकणारा विद्यार्थी गणेश चतुर्थी दिवशीची सुटी असल्याने जनावरे चारत असताना त्यांना पाणी पाजण्यासाठी गावाजवळील राणूबाई तळ्यावर गेला होता. अजितच्या हातात गायीची दोरी होती. गाय पाण्याजवळ गेल्यानंतर तिने जोरदार झटका दिला. यामुळे अजित तळ्यातील पाण्यात पडला. तळ्यात पाणी असल्याने तो बुडू लागला. सोबत असलेल्या गणेश लालचंद आव्हाड या मुलाने आरडाओरड केली. मात्र जवळ कोणी नसल्याने नाइलाज झाला. सुमारे अर्धा तासाने गणेश घुगे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अजित यास बाहेर काढले.तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलीसपाटील राजाराम काकड यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली. मयत अजित आव्हाड याचे दोडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी पास्ते येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत अजित याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)
तळ्यात बुडून बालकाचा मृत्यू
By admin | Updated: September 6, 2016 22:05 IST