कळवण : तालुक्यातील ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्पाची गळती प्रतिबंधक दुरुस्ती व सुधारणा कामास राज्य शासनाने सात कोटी १२ लाख रु पयांची प्रशासकीय मान्यता दिली असून, दोन वर्षांपूर्वी कामाची निविदा काढून कामासाठी ठेकेदार निश्चित करूनदेखील वर्षभरापासून धरणाचे काम ठप्प झाल्याने ओतूरसह २० गावांतील शेतकरी बांधवामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा व शासन निर्देशानुसार दोन वर्षांत काम पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. एक्स्प्रेस फीडरअभावी भेंडीचे १३ कोटींचे पणनचे कांदा, डाळींब व द्राक्ष निर्यात सुविधा केंद्र धूळ खात पडून असल्याने एक्स्प्रेस फीडर बसवून वीजपुरवठा सुरळीत करून द्यावा व शेतकरी सहकारी संघाला कांदा निर्यात केंद्र चालविण्यास द्यावे, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार व भाजपा शहराध्यक्ष निंबा पगार, संचालक राजेंद्रनाथ पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कळवण येथे नव्यानेच स्थापन झालेल्या नगरपंचायतीमुळे शहरातील समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्यांअभावी प्रशासन पूर्णत: ढेपाळले असून, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जनतेची कामे कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण लक्ष घालून मुख्याधिकारीसह प्रमुख शासकीय यंत्रणेची नगरपंचायतमध्ये तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार यांच्यासह गटनेते, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)
मुख्यमंत्र्यांना विविध समस्यांचे निवेदन
By admin | Updated: January 18, 2016 22:03 IST